रयतेचा राजा

प्रस्तावना

views

3:39
मुलांनो, महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. ते इतर राजांप्रमाणे स्वत:ला त्याचा उपभोग घ्यायला नव्हे, तर आपली प्रिय जनता सुखी होण्यासाठी. स्वराज्यातील सर्व गोष्टी त्यांनी रयतेला डोळ्यांसमोर ठेवूनच केल्या. त्यांचे आपल्या रयतेवर कसे प्रेम होते ते आपण या पाठातून पाहाणार आहोत. रयतेच्या सुखासाठी :- शिवरायांना त्यांचे वडील शहाजीराजे यांच्याकडून पुणे, सुपे, इंदापूर, चाकण या प्रांतातील छोटीशी जहागीर मिळाली होती. या जहागिरीतूनच त्यांनी अतिशय भव्यदिव्य व समृद्ध असे स्वराज्य निर्माण केले. शिवराय लहान असताना त्यांनी पाहिले होते, की परकीय शत्रू कशा पद्धतीने आपल्या मुलुखावर स्वा-या करायचे. या अन्याय व अत्याचाराची महाराजांना चीड यायची. त्यांनी लोकांना याविरुद्ध लढण्यासाठी जागे केले, त्यांच्यात स्वाभिमान निर्माण केला. त्या लोकांची मदत घेऊन व स्वत:चा जीव धोक्यात घालून आणि आपल्या सर्व बलाढ्य शत्रूंचा पराभव करून शिवरायांनी न्यायाचे स्वराज्य निर्माण केले. त्यामुळे महाराजांच्या स्वराज्यातील रयत सर्व बाजूंनी सुखी झाली. सेवकांवर माया :- इतर राजांच्या बाबतीत सेवक म्हणजे नोकर असत. राजाने त्यांना पगार द्यायचा व नोकराने त्यांची चाकरी करायची, युद्धात लढायचे. त्यात त्याला मरण आले, तर विषय तिथेच संपला. राजाला त्याच्याशी काही देणेघेणे नसे. परंतु, महाराजांचे मात्र असे नसे. त्यांची आपल्या सेवकांवर मोठी माया होती. त्यातील काही तर महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते. त्यांच्यात महाराजांनी कधी जात, धर्म, आपला – परका, गरीब- श्रीमंत असा भेदभाव केला नाही. प्रत्येकातील गुण ओळखून त्यांनी त्यांच्यावर त्यानुसार जबाबदाऱ्या सोपवल्या. आग्र्याच्या कैदेतून महाराज निसटून येताना आपला जीव धोक्यात घालून महाराजांना मोलाची साथ देणारा मदारी मेहतर याला शेवटपर्यंत अंतर दिले नाही. नेहमी त्याला मदत केली. प्रतापराव गुजर यांनी तर महाराजांच्या एका शब्दासाठी मोठे धाडस करून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. शिवराय त्यांचे ते बलिदान विसरले नाहीत. त्यांनी प्रतापराव गुजर यांच्या मुलीचे लग्न आपला दुसरा मुलगा राजाराम यांच्याशी केले. अशा कितीतरी गोष्टी आहेत, त्या सांगाव्या तेवढ्या थोड्याच. त्यांनी आपल्या सेवकांची काळजी एखाद्या पित्याप्रमाणे घेतली.